मळभ
आज घराघरातील पहाटे वाजणारे अलार्म बंद झाले. पहाटे वावरणारे दूध विक्रेते, वृत्त पत्रक विक्रेते, सकाळच्या पहिल्या ट्रेन , बस ची वाट बघणारे, शाळा, कॉलेज साठी गडबडीत जाणारे विद्यार्थी इ. वर्दळ आज अचानक शांत झाली आहे. माणूस नकळत सतत कोणत्या तरी अदृश्य गोष्टीच्या मागे धावत असतो. नकळत आजूबाजूला होणाऱ्या स्पर्धेच्या जाळ्यात अडकत जातो. व शेवटी स्वतःला नक्की काय हवे ? आहे याचा ठाव ठिकाणा च त्याला लागत नाही.आणि अचानक ही रोज होणारी स्पर्धा एक दिवस थांबते. या वर्षी कळलेले नवीन दोन इंग्रजी शब्द म्हणजे Lockdown आणि Quarantine काहींना याचा अर्थ समजला पण ज्यांना समजला नाही त्यांनी आजूबाजूची परिस्थिती बघून समजावून घेतला.
थांबलेले हे जग काहींना सुखावून जात आहे तर काहींना दुःखाची न सांगता येणारी किनार देत आहे. प्रसंग एकच आहे पण एकी कडे आनंद आहे, तर दुसरीकडे उद्याच्या जगण्याची चिंता आहे. दिवस सारखाच आहे पण एका घरात सगळे कुटुंब एकत्र असल्यामुळे रोज नवनवीन मेजवान्या होत आहे, कौतुक सोहळे होत आहे, रोजचा दिवस आरामदायी, मनोस्कत राजेशाही थाटात सुरू होत आहे, तर दुसरीकडे म्हणजेच एका झोपडीत, निवारा केंद्र मधे परत आयुष्यात कधी घरच्यांना पाहायला मिळेल की नाही?, उद्या तरी रेशन चा दुकानात धान्य भेटेल की नाही?? की आज पुन्हा लाचाऱ्या सारखे मोफत अन्न पाकिटे घेऊन फोटो काढून घेतले जातील. या विचारात दिवस संपत आहे. एकीकडे परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग खुश आहेत, तर दुसरीकडे एवढ्या मेहनतीने विद्यार्थ्यांसाठी काढलेले अवघड पेपर रद्द झाल्यामुळे शिक्षक मात्र नाराज आहेत. एकीकडे न मागता ही मिळालेली सुट्टी घेऊन कामगार वर्ग खुश आहेत तर दुसरीकडे कंपनी बंद असूनही पगार द्यावा लागणार म्हणून मालक लोक मात्र नाराज आहेत. कुठे घराघरात मास्टरशेफ, गायक, चित्रकार, रंगकार, वाचक चमकू लागले, तर कुठे दुर्लक्षित राहिलेले सफाई कर्मचारी, नर्स, पोलिस, भाजीवाला, दुकानदार, डॉक्टर हे अचानक खरे नायक व देव वाटू लागले. काही निराशावादी मने आता परिस्थिती खूप बिघडेल, जग संपण्याच्या मार्गावर आहे या विचारात मग्न आहेत. तर दुसरीकडे सगळ्या वाईट चाललेल्या घटनान मधून पुढे काहीतरी चांगले होणार आहे,देवाची व निसर्गाची एक जादू च होणार आहे या आशेवराती जिवंत आहेत.
अचानक आलेले काळया ढगांचे मळभ काहींना दुःख देऊन तर काहींना सुखावून थोड्या वेळानं निघून इंद्रधनू पसरवून जाते. त्याचप्रमाणे हे पण दिवस जातील व या व्यतित केलेल्या दिवसांच्या आठवणी सांगताना आपल्या येणाऱ्या संध्याकाळी निघून जातील.
लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर, कोथरूड, पुणे-३८
Comments