||आई||
|| श्री ||
आई...
खरे तर, आपल्या जन्मा पासून च आपले जग आई भोवतीच फिरत राहते. आपण आज माणूस म्हणून कसे आहोत? आपली ओळख; ही खरे आईने केलेल्या संस्काराचे व प्रेमाचे मुर्तिंमंत उदाहरण आहे. आपला स्वभाव , आवडीनिवडी या आईने केलेल्या शिस्तीच्या व प्रेमाच्या जोरावर ठरत जातात. मग ते वाईट असो वा चांगले. आई खरे तर एका मुला बरोबर एक घर पण घडवत असते. म्हणून तर आपल्या हातून काही वाईट घडले तर पहिला दोष लोक आईला देतात. "तुझ्या आई ने तुला काही शिकवले नाही का?" आणि काही चांगले करत असू तर मात्र "अरे वा! घरातले संस्कार चांगले आहे". म्हणजेच दोष नेहमी आईला आणि शाबासकी मात्र सगळ्यांना.
शालेय जीवनात पण पहिला लिहलेला निबंध माझी आई हाच असतो. पुढे मात्र जसजसे ज्ञान वाढत जाते तसे आईचे शिक्षण मात्र कमी वाटू लागते. व आई तुला एवढे पण समजत किंवा कळत नाही का? असे आपण नकळत च म्हणू लागतो. परंतु शालेय जीवन कमी असले म्हणून काय झाले आपल्या आयुष्यातील पहिली डॉक्टर, शिक्षक, ड्रेस डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, बँक मॅनेजर, मानस उपचार तज्ञ ही तीच असते. त्याच बरोबर घरातील वास्तू विशारद, प्लंबर, इंजिनिअर ही आईच असते. आई आजारी असेल तर संपूर्ण घरचं आजारी वाटू लागते. आईच्या बदलणाऱ्या मूड नुसार घरातले वातावरण बदलत जाते.
लहानपणी आई देत असलेल्या धपाटे (मार) यामुळे
तिचा खूप राग यायचा. लहानपणी अभ्यासाला बसताना ती एक मेणबत्ती व एक जाड पट्टी घेऊन बसत असे. त्या धाकानेच अभ्यास काहीही कुरबुर न करत करावाच लागे. कोणाच्या घरी गेल्यावर जर त्यांनी समोर ठेवलेला खाऊ दुसऱ्यांदा हातात घेतला की आईच्या त्या नजरेने च हात परत मागे येई, फिरायला बाहेर कुठे गेल्यावर कधीच बाहेरचे पदार्थ ती खायला देत नसे. व कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट धरण्याची हिंमत च कधी होत नसे. तेव्हा वाटे ही अशी कडक दुर्गा माते सारखी माझीच आई का आहे ही. तेव्हा तिचा खूप राग येत असे व दुसऱ्यांची आई बघा किती चांगली असेच वाटायचे. पण आज आजूबाजूला शॉपिंग, व्यसने, हॉटेलच्या खाण्याच्या आहारी गेलेल्या, चुकीच्या मार्गावर गेलेल्या मित्रमैत्रीणीना बघितल्यावर वाटते आजकाल किती सहजरित्या माणूस चुकू शकतो पण तरी मी ठामपणे सांगू शकते या जाळ्यात कधी मी अडकणार नाही कारण आईने लहानपणीच सहनशीलता व संयमाचे बाळकडू दिले आहे. आज जर काही चुकीचे करण्याचे विचार जरी आला. तरी तो पट्टी घेतलेला हात व खालेला मार आठवतो व नकळत मन सावध होते. माझी आई जरी कमी शिकली तरी आज आम्ही दोघी बहिणी आप आपल्या क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट/मास्टर्स आहोत ते फक्त आमच्या बुध्दी मत्ते वर नाही तर आईने दिलेल्या फी च्या व हिंमतीच्या पाठबळ मुळेच. आईबद्दल कितीही लिहले तरी ते कमीच.
शेवटी आठवीत लिहलेल्या उपमा अलंकारचे उदाहरण आठवले,
सह्याद्रीच्या पर्वता सारखी ठाम|
झऱ्याच्य्या पाण्याप्रमाणे निर्मळ|
चंदना सारखे झिजनारी|
गुलाब सारखी सुंदर|
मोगरा सारखी सुवासित|
सागरा सारखे मन|
Comments
कारण आई आईच असते.