नातीगोती
संध्याकाळची वेळ होती. सुट्टी होती म्हणून घरा बाहेर बसून मामाच्या छोट्या मुलांना मी पाटीवर शिकवत होते. मुले मग्न होऊन अभ्यास करू लागली. त्यांना पाहून इतर खेळणारी लहान मुले देखील घरातून स्वतःच्या पाट्या घेऊन अभ्यासाला गोल बसली. दोन तीन दिवस सलग हा लहान मुलांचा वर्ग बाहेर बसू लागला. अभ्यासाची टाळाटाळ करणारा शेजारचा दर्शन रोज पाटी घेऊन अभ्यासाला येऊ लागला. कुठे जातो म्हणून दर्शन ची आई एक दिवस घरी आल्या आणि, "दीदी उद्या पासून दर्शन ला तुझ्या कडे शिकवणीला घेतेस का?" म्हणून विचारू लागल्या. "माझे सध्या पदविका शिक्षण सुरू आहे म्हणून मला तरी नाही जमणार असे सांगून मी नकारच देत होते." पण , "हा आमचे घरी काही ऐकत नाही, शाळेत पण काही करत नाही पण दोन तीन दिवस स्वतःहून इकडे अभ्यासाला येत आहे. , तुला जमेल त्या वेळी घे पण तूच याला शिकव." असे त्या विनवू लागल्या. मला ही नकार देता न आल्यामुळे दर्शन ची शिकवणी सुरू झाली. माझा पहिला विद्यार्थी . सकाळी कॉलेज व संध्याकाळी एकट्या दर्शन ची शिकवणी सुरु झाली. तो पहिली मध्ये असल्यामुळे एवढं ताण न पडता शिकवणी सुरु झाली. एका महिन्या नंतर दर्शन च्या आईच्या ओळखी मुळे अनाथ आश्रमातील दोन दहावी तील मुली व त्यांच्या दोन मैत्रिणी शिकवणीला येऊ लागल्या . अश्या प्रकारे माझी शिकवणी सुरू झाली. दर्शन सगळ्यात लहान म्हणून माझी आई पण त्याला रोज आल्यावर खाऊ देत असे, त्याचे लाड करत असे. पुढे काही वर्षांनी दर्शन लांब राहायला गेला तरीपण शिकवणी साठी तो आमच्या घरी येत असे. विद्यार्थी पेक्षा तो आता घरातलाच सदस्य झाला. त्याला बहीण नसल्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनला तो माझ्याकडून राखी बांधून घेत असे. त्याच्या गावी गेल्यावर माझ्यासाठी तो स्वतः झाडावरून तोडलेले आंबे, करवंद, चिंचा ई. घेऊन येत असे. तो लहान असून देखील मी त्याला माझे कॉलेज दाखवायला नेत असे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना तो परिचयाचा झाला होता. वर्ष लवकर निघून गेलीत, दर्शन पाचवीत असताना पदवी शिक्षण संपल्यावर नोकरीच्या व्यापात मी पुढे शिकवणी घेणं बंद केले. तरी देखील दर्शनचे आणि आमचे घरच्यान सारखे संबंध तसेच टिकून राहिले. कठीण काळात माझ्या आईच्या ओळखी मुळे त्याच्या आईं वडिलांना नोकरी देखील मिळाली.व हे संबंध आणखी दृढ होत गेले. पुढे काही वर्षांनी माझे बाबा गेल्यावर आमचे हसते खेळते घर उदास झाले. संध्याकाळी ते खूपच भेसूर वाटू लागे. तेव्हा माझी बंद असलेली शिकवणी मी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दर्शन व त्याचे इतर मित्र शिकवणीला येऊ लागले. आमचे घर रोज संध्याकाळी लहान मुलांनी भरू लागले. जणू शांत वृक्षा वर रोज पाखरे किलबिल करू लागली. उदास घरात, माणसांत पुन्हा नवचैतन्य आले. लहानपणी तो एकदा बोललेला, "दीदी मी आता दहावी पर्यंत तुझ्या कडेच येईल", तेव्हा मी थोडीना इतके वर्ष शिकवणी घेणार आणि हा इतकी वर्ष माझी ओळख ठेवणार तरी का? असे वाटून मला त्याच्या त्या इच्छेचे हसायलाच यायचं. पहिली पासून माझ्या कडे येणारा दर्शन यंदा दहावीत शिकत आहे. व अजूनही त्याच्या हक्काच्या दीदी कडेच येत आहे.
काही नाती रक्ताची जरी नसली तरी ती आपल्या आयुष्यात असतात. आपल्याला नकळत खूप काही देत असतात. ही नाती सख्खे , परके याच्याही पलिकडली असतात. ही नाती जोपासताना वेगळे काही करावे लागत नाही. आपुलकीच्या ओल्याव्यात ती निस्वार्थीपणे सदैव एकमेकांना जोपासत असतात. या एका अनपेक्षित नात्यामुळे अनेक नवीन विद्यार्थी रुपी नाती माझ्यासोबत जोडली गेली. आमचे हे नाते असेच अतूट राहू दे .
लेखन - कु. समिक्षा श्रीधर केरकर
Comments