बाबा | बापाशी | पप्पा


|| श्री ||

बाबा...

    बाबा काय लिहू आज तुमच्या बद्दल? तुम्ही असताना नव्हता असा दिवस.आज सगळ्यात जास्त मला आठवत आहे ती दिवसातून शंभर वेळा  बाबा, पपा, बापाशी इत्यादी अशा सारख्या हाका मारून तुम्हाला बोलवत राहणे.  तुम्ही अजून कसे घरी आलात नाहीत म्हणून तुम्हाला सतत फोन करत राहणे., तुम्ही कामावरून घरी आल्यावर आणलेल्या खाऊ साठी तुमची बॅग उचकटून पाहणे. गाडी वरून फिरायला घेऊन जाण्यासाठी सारखा हट्ट करणे.  बाबा मला अजूनही आठवत आहे लहानपणी तुम्ही दाखवलेले जाणता राजा नाटक, घरी आणलेली गोष्टीची पुस्तके, बालवाडी पासून ते इंजिनिरिंग पर्यंत प्रोजेक्टला केलेली मदत, तुमची प्रत्येक आठवण सांगत दाखवलेला आपला गाव. अशा असंख्य आठवणी असतील.  तुम्ही न बोलता सगळे काही कळत होते. तुमचा स्वतःशीच संघर्ष दिसत होता. पण त्या वेळीस काहीच करता येत नव्हते. तेव्हाच ठरवलेले सगळी स्वप्न पूर्ण करायची ती तुमचीच. तुम्हाला आयुष्यात जे काही नाही मिळाले ते सगळे मिळवून द्यायचे. तुम्ही गेलात आणि ती स्वप्न देखील तुमच्या बरोबर गेलीत.
    तुमचा संघर्ष तुम्ही कधीच नाही सांगितला. इतरांकडूनच ते कळत होते. तरी देखील नेहमी हसतमुख, शांत राहायला तुम्हाला कसे जमत होते. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती यातना असतील हे इतरांकडून तुमची गोष्ट ऐकल्यावर कळाले. कितीही संकटे असली तरी मी माझ्या उभ्या आयुष्यात तुम्हाला कधीच देवाला , परिस्थितीला, माणसांना दोष देताना तुम्हाला कधीच पाहिले नाही. तुम्ही शिकवलेली कला शिकून इतर लोक तुमच्यापेक्षा खूप प्रगती करत होती तरी देखील त्यांची कधी इर्षा करताना मी पाहिले नाही. उलटे त्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक मदत च करताना मी पाहिले. बाबा तुमचा एकही शत्रू नव्हता. किंबहुना तुमच्या बद्दल कोणीही कधीच वाईट बोलले नसेल. कोणाचा द्वेष ,राग, तिटकारा करणे तुम्हाला कधीच माहिती नव्हते. लोक तुमचा सरळ साधा स्वभाव बघून फसवत होती तुम्हाला ते कळत नव्हते असे नव्हते. तरी पण कोणाला कधी दुखवायचे नाही या हेतूने तुम्ही शांतच असत.
    पैसा तुमच्या आयुष्यात कधीच महत्वाचा नव्हता. मी कधीच तुम्हाला पैशांच्या मागे धावताना पाहिले नाही. तुम्ही फक्त जगण्या पुरतीच पैसे कमवले. तरी देखील तुम्ही मानाने जगत होतात. कर्ज, लबाडी इत्यादी पासून तुम्ही दूरच होतात. तुटपुंज्या पैशां मध्ये पण जगण्याचा खरा आनंद तुम्ही घेत होता.  तुमची खरी श्रीमंती तुमच्या स्वभावात होती. गावात, कामावर, बस मध्ये, इत्यादी ठिकाणी तुम्ही माणसे  आपलीशी केली होती. तुमच्याशी एकदा बोललेला माणूस तुम्हाला आयुष्यभर कधीच विसरणार नाही.
    बाबा, सगळे म्हणायचे, तुम्ही या जगाच्या तुलनेत आयुष्यात खूप मागे राहिला, नवीन जगाशी जुळवून तुम्हाला घेताच आले नाही. व्यवहारात तुम्ही खूप कमी पडला. पण त्यांना कोण सांगणार हे स्वार्थी जग तुमच्यासारख्या निष्पाप माणसासाठी नव्हतेच. कदाचित देवाला पण कळत होते. म्हणूनच तुम्हाला काहीही त्रास न देता तो हसत खेळत या जगातून एका क्षणात घेऊन गेला. जाताना देखील तुम्ही कोणालाच कसलाच त्रास दिला नाहीस. जितक्या शांततेने तू आयुष्य जगत होता. तसेच तू न बोलता या जगाचा निरोप घेतला.  
    वाईट याच गोष्टीचं वाटते की, तुम्हाला मला जगातील सगळ्यात सुखी बाबा बनवायचे होते. पण ते एकुलते एक स्वप्न देखील नियतीने पूर्ण होवू दिले नाही. तुम्ही जिथे असेल तिथे स्वर्गच असेल. कधी कधी वाटते तुम्ही आजू बाजूला च असतात. कोणतेही संकट असताना कोणी मदत करायला आले तर वाटते तुम्हीच कोणाला तरी पाठवले असेल. आजारी पडल्यावर स्वप्नात येऊन तुम्ही काळजी करत असतात. माझ्या निकालावर, पुस्तकावर तुमचे नाव बघून वाटते तुम्ही पाठीवर हात ठेवून आशीर्वाद च देत आहात. बाबा आज जरी शरीराने तुम्ही सोबत नाहीये. तरी माझ्या बरोबर तुमची सावली प्रत्येक क्षणाला सोबत असते. आणि ही तुमची साथ च नवीन मार्ग दाखवत असते व आधार देत असते. बाबा, जसे कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आधी तुमच्या नावातील श्री लिहतात, तसेच माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुरुवात तुम्हाला स्मरून च असेल. शेवटी एवढेच सांगेल झरा सारखा निर्मळ, वट वृक्षा सारखी सावली देणारा, चंद्राच्या प्रकाशा सारखा शांत माझा बाबा मला खूप आवडतो.

तुमची,
कु. समिक्षा श्रीधर केरकर



Comments

उर्मिला केरकर. said…
अप्रतिम लेख, समीक्षा
आपल्या माणसांची स्तुती जेव्हा दुसऱ्याच्या तोंडून ऐकताना सांगणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येते हिच खरी त्या माणसाची कमाई असते."श्रीकाका" आयुष्यात कधीही न विसरता येणारी निस्वार्थ व्यक्ती.
शतशः प्रणाम.
धन्यवाद वहिनी..... 🙂

Popular posts from this blog

Happiest Birthday to Aai

Presence

Angel