शेवट गोड करी....
शेवट गोड करी....
शेवट गोड करी! गुरुराया, शेवट गोड करी!
शेवट गोड करी! गुरुराया, शेवट गोड करी!
या भजनाच्या ओळी लहानपणी रविवारी कलावती आईं च्या मंदिरात जेव्हा ऐकू यायचा तेव्हा काही पेंगलेली लोक व आम्ही लहान मुले लगेच भानावर येऊन उत्साहात टाळ्या वाजवून मोठ्याने हे भजन म्हणत असू. कारण हे भजन सुरू झाल्यावर कळायचे हे शेवटचे भजन संपून आता भजनाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आणि स्वादिष्ट गोड प्रसाद खायला भेटणार. त्यामुळेच सगळ्यात आवडीचे भजन होते शेवट गोड करी!. पण खरच शेवट गोड असतो का??
इतिहासात बघितले तर एखादी व्यक्ती, प्रसंग, आठवण जितकी संघर्षमय त्याचा शेवट तितकाच उत्कृष्ट व काहीतरी नवीन गोष्ट शिकवून देणारा. म्हणूनच, महाभारत झाल्यावर काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींचा संहार झाला. अनेक समर्थ वीर योद्धे सामर्थ्यवाण असून देखील काळच्या पडद्याआड गेले. परंतु त्यांच्या शेवटाने त्यांचे संघर्षमय जीवन संपवून मुक्तीच दिली. त्याच प्रमाणे जीवन जगण्याची पवित्र गीता अखंड मानव जातीला कळाली.
आपल्या जीवनातील काही आठवणी, प्रसंग आपल्याला त्या क्षणी क्लेशकारक, दुःखदायक वाटत असतात. पण पुढे काही काळ गेल्यावर जे झाले ते बरेच झाले असे वाटायला लागते. शैक्षणिक जीवन कितीही नकोसे वाटले तरी एकदा पूर्ण झाल्यावर ते पदवीचे प्रमाणपत्र बघितल्यावर आपल्याला आयुष्यात काहीतरी पूर्ण केल्याचे समाधान भेटते. पुढे नोकरी शोधताना पहिल्यांदा करायला लागणारा संघर्ष बराच त्रासदायक वाटतो. परंतु या संघर्षातून भेटलेल्या अनुभवातून जेव्हा एखादी नोकरी भेटते तेव्हा ती मिळवल्याचा आनंद त्या व्यक्तीलाच माहिती असतो. आपल्या आयुष्यातील नवीन नाते पुढे आनंदाचे क्षण घेऊन येत असते. तर, जुनी नाती कायमची दुरावत असली तरी, पुढे निराशाजनक दुःखी आयुष्य जगण्यापेक्षा व्यतीत केलेल्या आनंदी रमणीय आठवणी देऊन जात असते. आपल्याला पण कदाचित लहानपणा पासून ते आतापर्यंत शेवट च आवडत असतो. म्हणूनच, लहानपणी शाळा सुरू होणाऱ्या पहिल्या घंटेच्या आवाजा पेक्षा आपण शेवटच्या घंटेच्या आवाजाची तर, ऑफीस मध्ये शेवटच्या मिनिटांची आतुरतेने वाट बघत असतो. कर्जाचा शेवटचा हप्ता आपल्याला जास्त सुखवतो. नेहमी एकसारखे चाललेले साधे आयुष्य जगत असताना अचानक कठीण संघर्षाचं काळ सुरू होत असेल आणि जर एका मागोमाग एक नवीन संकटे उभी राहत असतील तर समजून जावे शेवट जवळ आला आहे. पण सुदैवाने या शेवटातून आपण वाचलो, तर काहीतरी अदभुत अनुभवून जीवन जगण्याची नवीन उमेद आपल्याला कळेल. म्हणूनच, शेवट गोड च होणार असेल तर उगाच चिंता करणे सोडून देऊया.
लेखक - कु. समीक्षा श्रीधर केरकर
Comments