निसर्गपुजा - समृद्ध वारसा

निसर्गपुजा - समृद्ध वारसा

लॉकडाउन  च्या  निमित्ताने लहानपणी रविवारी बघितलेले रामायण पुन्हा बघता आले. आणि त्यातील सीता देवी चे भूमीत जाणे  हा प्रसंग पहिल्यावार लहानपणीचा एक किस्सा आठवला. त्या रविवारी सकाळी रामायण मधील सीता भूमीत जाण्याचा प्रसंग बघून आम्ही लहान मुले रडायलाच लागलो. खूप विचार करत बसलो. सीता जमिनीत गेली म्हणजे ती जमीन पवित्र झाली. ती अजुनही तिथेच आहे म्हणून घरातून बाहेर पडताना आम्ही लहान मुले आपला चप्पल घातलेला  पाय जमिनीला स्पर्श करू देत नव्हतो . कसरत करून मातीला पाय लावता फक्त सिमेंट च्या पायरीचा  वापर करत होतो. आपला पाय पवित्र जमिनीला लागू नये याची काळजी दिवसभर घेत होतो. आता त्या बालिश बुद्धीचे हसूच येते. पण आता आपल्या या  हिंदू संस्कृती चे कौतुकच वाटते. निसर्गातील प्रत्येकाला  आपण देवाचे रूपच मानत  आलो आहोत. कोंकणातील प्रत्येक  घरातील देव घरा जवळील भिंती वर नागोबा चे चित्र रंगवलेले किंवा त्याची प्रतिकृती असलेली फरशी ही असतेच. निसर्ग पूजक असलेला कोकणी माणूस नागोबाचे अस्तित्व सदैव  आपल्या घरात पुजत असतो. परंतु या चित्रातल्या नागाला आपण पुजतो तर प्रत्यक्ष दिसणाऱ्या नागाला बघून का आपली बोबडी का वळते?  लहानपणी  पुस्तकात वाचलेले साप किंवा नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. पण हा मित्र शेतात दिसल्यावर त्याला मारायला का जातो आपण? श्रावण  महिन्यात आपला प्रत्येक सण निसर्ग पूजेचे प्रतीकच आहे. या महिन्यात शुद्ध शाकाहारी राहून आपण निसर्गातील प्राण्याचे जतन करत असतो. नारळी पौर्णिमेला  समुद्राची पूजा करून त्याच्या विशाल पणाची त्याची आपल्या वर कायम कृपा असावी या साठी प्रयत्न करत असतो. परंतु इतर दिवशी त्याच विशाल समुद्रात घाणीचे साम्राज्य टाकून त्याला अपवित्र का करत असतो?

आपल्या संस्कृती ने आपल्याला या निसर्गाला देवांच्या  रुपात पुजायला, जतन करायला शिकवले आहे. आपली संस्कृती आपल्याला फक्त मूर्ती पूजा नाही तर, निसर्ग पूजा देखील करायला सांगते म्हणून तर,धरती मध्ये सिता चे  स्थान, सागर मध्ये असलेले नारायण लक्षुमी देव  , पाऊस पडणार वरुण देव, सूर्य प्रकाश देणारा सूर्य देव, गंगा, सिंधू, सरस्वती या देवी रूपातील नद्या, रात्री दिसणारा चंद्र देव तसेच रात्री चमचमणारे ताऱ्यान मध्ये दिसणारा ध्रुव, शुक्र तारा, त्याचं प्रमाणे हत्ती मध्ये दिसणारा गणपती बाप्पा, वानारा मध्ये दिसणारा रामभक्त हनुमान, गायी मध्ये दिसणारी  गोमाता, बैला मध्ये दिसणारा नंदी , नागपंचमीला केली जाणारी नागपुजा, वट पौर्णिमा निमित्ताने केलेली वटपुजा, रोज अंगणातील केलेली तुळशी पूजा .

जे लोक खरच श्रद्धाळू असतील देवाला मानत असतील ते निसर्गाला बाधा निर्माण होईल असे कधीच काही करणार नाही. परंतु जे देवाच्या भक्तीला कर्म कांड, अंधश्रद्धा समजतात त्यांनी एकदा ही निसर्ग पूजा करून पहावी. तेव्हा खरे त्यातील श्रद्धा, शांतता, समृध्दी त्यांना नक्कीच समजेल. मुळातच निसर्ग पूजक असलेली आपण शहरात आल्यावर, खूप शिकल्यावर या निसर्ग देवाची विटंबना का करत असतो? त्याची पूजा किंवा तो जतन करायला नाही जमले तरी त्याची नासधूस होणार नाही याची आपण जबाबदारी घेऊया.

 एखाद्या मानवाला जर त्याच्याच जिवलगांनी  त्रास दिला तर तो खचतो, तसेच जर आपण सतत निसर्ग रुपी देवाला दुखवत असू तर तो त्याचे रुद्र रूप दाखवणार ना. ज्या प्रमाणे मंदिरातील, देवघरातील देवाची आपण मनोभावे पूजा करतो, त्याचप्रमाणे या निसर्गातील देवाला ही आपण पुजुया, त्याचे पावित्र्य राखुया. आपली संस्कृती, निसर्ग यांचे जतन करून आनंदाने पुढील पिढीला आपला समृध्द वारसा देऊया.


लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर







Comments

Popular posts from this blog

Happiest Birthday to Aai

Presence

Angel